पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना
शेतीमध्ये अथवा इतर ठिकाणी काम करत असताना ७/१२ धारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू आल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजने अंतर्गत रक्कम रु २.०० लाख पर्यंतचे लाभ मिळत आहे. त्यासाठी शेतक-यास कोणत्याही प्रकारचा विमा हप्ता भरावा लागत नाही. परंतु ज्यांचे नावे ७/१२ उतारा नाही असे शेतकरी कुटुंबातील सदस्य, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. परंतु केंद्र शासनाने पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना देशामध्ये सुरु केली असून या योजनेमध्ये १८ ते ७० या वयोगटातील देशातील कोणत्याही महिला/पुरुष नागरिकाला सहभागी होता येते. यायोजनेंतर्गत अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास रक्कम रु २.०० लाख पर्यंतचे लाभ देय आहेत. या साठी फक्त १२.०० (बारा) रुपये विमा हप्ता भरवायचा असून आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे आवश्यक आहे. या योजनेचा कालावधी दि. १ जून ते ३१ मे असा असल्याने संबधितांनी दि ३१ मे पूर्वी आपला अर्ज बँकेत सादर करणे आवश्यक आहे. सबंधित बँक आपल्या खात्या मधून रक्कम रुपये १२.०० वजा करून ती विमा कंपनीस पाठवेल व आपणास १ वर्षसाठी अपघाती मृत्यू/अपंगत्वास रक्कम रुपये २.०० लाखाचे संरक्षण प्राप्त होईल. तरी सर्व शेतकरी, भूमिहीन शेतमजूर बंधू भगिनींना आवाहन करणेत येते की, आपल्या कुटुंबातील सर्व पात्र वयोगटातील (१८ ते ७०) सदस्यांचा विमा हप्ता भरुन योजनेत सहभाग घेऊन विमा संरक्षण प्राप्त करुन घ्यावे.
=सुनील बोरकर
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा